राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान उद्घाटन प्रसंगी प्रभारी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, महापालिका आयुक्त शुभम गुप्ता व अन्य.
प्रभारी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे; राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान२०२५ चे उद्घाटन
सांगली / प्रतिनिधी
वाढते अपघात टाळण्यासाठी व रस्ते सुरक्षेसाठी शालेय स्तरावरच विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांची माहिती देऊन, त्याचे पालन करण्याची सवय लावणे आवश्यक आहे. वाहतूक नियम व रस्ते सुरक्षेबाबत जनजागृती ही केवळ प्रशासकीय पातळीवरच न राहता यासाठी सामाजिक चळवळ उभी राहावी, असे प्रतिपादन प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा रस्ते सुरक्षा समितीच्या अध्यक्षा तृप्ती धोडमिसे यांनी आज येथे केले.
उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, सांगली जिल्हा पोलीस दल व सार्वजनिक बांधकाम विभाग सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “सडक सुरक्षा - जीवन रक्षा” राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान २०२५ च्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. वसंतदादा औद्योगिक वसाहतीच्या चारूभाई शहा सभागृह येथे आयोजित या कार्यक्रमास सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका आयुक्त शुभम गुप्ता, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्रांतीकुमार मिरजकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी तथा जिल्हा रस्ते सुरक्षा समितीचे सदस्य प्रसाद गाजरे, शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी आदि मान्यवर उपस्थित होते.
वाहतूक नियमांचे पालन करण्याचा नववर्षाचा संकल्प करूया, असे आवाहन करून प्रभारी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे म्हणाल्या, दर्जेदार रस्ते, रस्ते सुरक्षेसाठी विविध माध्यमांतून प्रबोधन करूनही रस्ते अपघातांचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. यासाठी गृहित धरणे ही मानवी प्रवृत्ती कारणीभूत आहे. वाहतूक नियमांचे पालन न केल्याने जीवित हानी व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होते. वाहन चालविताना आपल्या छोट्या कृतीही अपघात टाळू शकतात. वाहन चालविताना मोबाईल फोनवर न बोलणे, योग्य वेगमर्यादा राखणे, हेल्मेट वापरणे व सीलबेल्ट लावणे अशा गोष्टींमुळे आपले कुटुंब सुरक्षित राहील, याची जाणिव सर्वांनी ठेवावी, असे त्या म्हणाल्या. महानगरपालिका आयुक्त शुभम गुप्ता म्हणाले, वैयक्तिक जीवनात आपणास अपघातास सामोरे जावे लागल्याने रस्ते सुरक्षेचे महत्त्व अधिक अधोरेखित झाले. वाहतूक नियमांचे पालन गांभीर्याने करणे आपल्या प्रत्येकाच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचे आहे.
पोलीस अधीक्षक संदीप घुगे म्हणाले, रस्ते अपघात टाळता आल्यास जीवित व वित्तहानी होणार नाही, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होणार नाही. त्यामुळे रस्ते सुरक्षेत समाजातील प्रत्येक घटकाने सहभागी व्हावे. यावेळी सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी आकाश गालिंदे, महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा दलाचे महासमादेशक अनिल शेजाळे यांच्यासह उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, पोलीस प्रशासनातील अधिकारी, मोटर वाहन निरीक्षक, कर्मचारी, वाहतूक संघटनेचे पदाधिकारी, ड्रायव्हिंग स्कूलचे प्रतिनिधी, तानुबाई खाडे इंग्लिश स्कूल, मिरजचे आर. एस. पी. बालसैनिक व विक्रांत गौंड, शासकीय तंत्रनिकेतनचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रसाद गाजरे यांनी राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाचा हेतू विषद केला. सूत्रसंचालन सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक सुनील मुळे यांनी केले. आभार पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी यांनी मानले.