yuva MAharashtra सांगली, कोल्हापूरसाठी 'गूड न्यूज'

सांगली, कोल्हापूरसाठी 'गूड न्यूज'

सांगली टाईम्स
By -

 

अलमट्टी धरण उंची बाबत केंद्रीय जळशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांच्याशी चर्चा करताना माजी खासदार राजू शेट्टी.

अलमट्टीची उंची वाढविण्याचा केंद्राकडे प्रस्तावच नाही; केंद्रीय जल आयोगाकडून स्पष्ट

सांगली / प्रतिनिधी
सांगली, कोल्हापुरकरांच्या उरात धडकी भरविणारा कर्नाटकातील अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याचा कोणताही प्रस्ताव केंद्रीय जल आयोगाकडे कर्नाटक सरकारकडून आलेला नाही, असे स्पष्टीकरण आयोगाचे अध्यक्ष डॉ. मुकेशकुमार सिन्हा यांनी दिले आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांनी यासंदर्भात त्यांची दिल्ली येथे भेट घेतली. चर्चा केली. दरम्यान आयोगाच्या या स्पष्टीकरनामुळे सांगली, कोल्हापूर जिल्ह्याला काही अंशी दिलासा मिळाला आहे.
दरम्यान असा कोणता प्रस्ताव असेल तर केंद्रीय जल आयोगाने कठोर भूमिका घ्यावी. या निर्णयास स्थगिती द्यावी, अशी मागणी शेट्टी यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री मंत्री सी. आर. पाटील व केंद्रीय जल आयोगाचे  अध्यक्ष डॅा.  मुकेश कुमार सिन्हा यांचेकडे केली आहे. 

अलमट्टी उंची वाढीबाबत प्रस्तावच नाही
 केंद्रीय जल आयोगाचे अध्यक्ष डॅा.  मुकेश कुमार सिन्हा म्हणाले कि, कर्नाटक राज्य सरकारकडून अशा प्रकारचा अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याचा कोणताही प्रस्ताव अद्याप आला नाही. तसा प्रस्ताव आल्यास याबाबतचा सखोल अभ्यास करून कर्नाटक व महाराष्ट्र राज्य सरकार यांच्याशी व विविध तज्ञांशी बोलून स्थानिक परिस्थितीचा अभ्यास करून  पुरामुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही याची दक्षता जल आयोगाकडून घेतली  जाईल. 
       स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील व केंद्रीय जल आयोगाचे  अध्यक्ष डॅा.  मुकेश कुमार सिन्हा यांची भेट घेतली. कर्नाटक राज्य सरकार  अलमट्टी धरणाची उंची ५२४.२५६ मीटरपर्यंत वाढविण्याचे नियोजन करत आहे. या निर्णयामुळे सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील कृष्णा, वारणा, दुधगंगा व पंचगंगा नदीकाठच्या गावांना मोठा फटका बसणार आहे. सांगली , कोल्हापूर व कर्नाटक सीमाभागातील बेळगांव व बागलकोट जिल्ह्यातील  पाणलोट क्षेत्रात असणारी जमीन पुराच्या पाण्याखाली जाणार असून नागरी वस्तीलाही याचा फटका बसणार आहे. 
आंबोली पासून ते महाबळेश्वर पर्यंत जवळपास २२० किलोमीटर सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर  पडणारा पाऊस हा अनेक उपनद्यांच्या माध्यमातून शिरोळ येथील कृष्णा नदीत येतो. कृष्णा नदीचा प्रवाह संथ असल्याने महापुरात सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पुर परिस्थीती नियंत्रणात येण्यास जवळपास १५ ते २० दिवस लागतात. जर कर्नाटक सरकारने अलमट्टीची उंची वाढविल्यास सध्यापेक्षाही कृष्णेच्या  पाण्याचा वेग कमी होवून महापुर काळात जवळपास ३५ ते ४० दिवसानंतर पुर परिस्थिती नियंत्रणात येईल. यामुळे सांगली , कोल्हापूर व कर्नाटक सीमाभागातील शेती ,व्यापार , उद्योग, आरोग्य व अर्थकारणावर मोठा परिणाम होणार आहे असल्याचे माजी खासदार शेट्टी यांनी मंत्री पाटील व अध्यक्ष सिन्हा यांच्या निदर्शनास आणले.