yuva MAharashtra जैन समाज महामंडळ मोठ्या कार्यक्षमतेने आणि आदर्शपद्धतीने चालेल

जैन समाज महामंडळ मोठ्या कार्यक्षमतेने आणि आदर्शपद्धतीने चालेल

सांगली टाईम्स
By -
सांगलीत जैन समाज अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यालय उद्घाटन प्रसंगी सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमीसे. बाजूस महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी, सदस्य रावसाहेब पाटील, भालचंद्र पाटील आदी.

 तृप्ती धोडमीसे; सांगलीत महामंडळाच्या कार्यालयाचे उद्घाटन; शेवटच्या घटकाला न्याय मिळेल

सांगली / प्रतिनिधी
जैन समाजाकडे उत्कृष्ठ संघटनकौशल्य आहे. हा समाज आदर्श आचार, विचार जपणारा आहे. शांतता, प्रामाणिकपणा आणि पारदर्शकपणा अंगीकृत असलेल्या या समाजासाठी स्थापन केलेले जैन समाज अल्पसंख्याक महामंडळ मोठ्या कार्यक्षमतेने आणि आदर्शपणे चालेल. समाजाच्या शेवटच्या घटकाला निश्चितपणे न्याय मिळेल असे प्रतिपादन सांगली जिल्हापरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले.
सांगलीत राजवाडा चौक येथील अप्पर तहसील कार्यालयाच्या इमारतीमध्ये  जैन समाज आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यालय उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. पुढे बोलताना त्या म्हणाल्या, जैन समाजाला खूप मोठी परंपरा आहे. अन्य समाजांनी या समाजाकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. या समाजाची जगा आणि जगू द्या या विचाराने वाटचाल सुरू आहे. त्यामुळे या महामंडळाचा समाजाला नक्कीच फायदा होईल. मुख्य महामंत्री डॉ.अजित पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.  अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे सदस्य, द.भा.जैन सभेचे अध्यक्ष रावसाहेब जि. पाटील यांनी देशातील इतर समाजापक्षा महाराष्ट्रातील जैन समाज हा मुख्यत: शेतकरी, छोटे व्यापारी असल्याचे सांगून महामंडळाच्या विविध योजनांचा आढावा घेतला.  समाजातील अधिकाधिक गरजूंना जास्तीत जास्त मदत देण्याचा या महामंडळाचा प्रयत्न राहील असे सांगितले. जैन समाज अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी महामंडळ स्थापन होण्यामागील प्रयत्न, मंत्रालयातील झालेल्या महामंडळाच्या दोन बैठकींमधील झालेले निर्णयांचा आढावा घेवून देशात सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाने असा निर्णय घेतला हे जैन समाजाच्या दृष्टीने गेल्या शंभर वर्षातील हा एक ऐतिहासिक निर्णय असल्याचे सांगितले. 
भालचंद्र पाटील म्हणाले, महाराष्ट्रातील गरीब, गरजू जैन बांधवासाठी या महामंडळाची अत्यंत गरज होती. ती पूर्ण झाली. त्यासाठी ललित गांधी यांनी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. त्यांची अभ्यासू वृत्ती, काम करण्याची धडाडी पाहता या महामंडळास पूर्ण वेळ देतील. रावसाहेब पाटील हे महामंडळाचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत यांच्याही सूचनांकडे आपण लक्ष देवून समाजाचे काम व्हावे. आपण एकत्र येवून सामंजस्याने एकमताने हातात हात घालून काम केल्यास नक्कीच समाजाचं मोठ काम होईल. खजिनदार संजय शेटे यांनी आभार मानले. यावेळी काकासो धामणे, अजित शिराळकर, सौ. कमल मिणचे, ॲड. जयंत नवले, पोपटलाल डोर्ले, अजित भंडे, स्वप्निल शहा, डॉ. देवपाल बरगाले, प्रा. बी. बी. शेंडगे, सचिन पाटील, प्रा. राहुल चौगुले, रमेश आरवाडे, महावीर खोत, अंजली कोले, संदिप हिंगणे,  विनोद पाटील, प्रशांत अवधूत, प्रविण वाडकर, अनिल हवाणे, अनिता संजय पाटील, अनिता विनोद पाटील, छाया कुंभोजकर, सुनिता चौगुले, मंगल चव्हाण, वीणा आरवाडे, अविनाश पाटील, मेजर विद्याधार उपाध्ये, स्वाती कोल्हापुरे, अशोक गौंडाजे, प्रशांत गौंडाजे, अल्पसंख्यांक सांगली कार्यालयाचे व्यवस्थापक सलिम नदाफ, नासिर नदाफ, जाहिदा कुलकर्णी आदि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Tags: