◼️जिल्हा बँकेचे १३४ कोटी अडकले
◼️पुन्हा निविदा मागविल्या
सांगली / प्रतिनिधी
जिल्ह्यातील बड्या राजकीय नेत्यांशी संबंधित असलेल्या पाच सूतगिरण्यांच्या थकीत कर्ज वसुलीसाठी जिल्हा बँकेने मालमत्ता विक्रीसाठी तिसऱ्यांदा लिलाव प्रक्रिया सुरू केली आहे. या सूतगिरण्यांकडे तब्बल १३४.४२ कोटी रुपयांची मुद्दल असून त्यावरील व्याज वेगळे आहे. बँकेने यापूर्वी दोनवेळा सूतगिरण्यांचा लिलाव जाहीर केला, मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नाही.
कर्जाच्या थकबाकी वसुलीसाठी बँकेने स्वामी रामानंदभारती सूतगिरणी (तासगाव), खानापूर तालुका स्पिनिंग मिल्स (विटा), शेतकरी विणकरी सूतगिरणी (इस्लामपूर), प्रतिबिंब मागासवर्गीय इंडस्ट्रिज (इस्लामपूर) व विजयालक्ष्मी कॉटन मिल्स (आटपाडी) या पाच सूतगिरण्यांच्या मालमत्ता विक्रीसाठी निविदा मागवल्या होत्या. या सूतगिरण्यांकडे डिसेंबर २०२४ अखेर केवळ मुदलाची १३४ कोटी ४२ लाख ५२ हजार रुपये थकबाकी आहे. यावरील थकीत व्याजही कोट्यवधी रुपयांच्या घरात आहे. या संस्थांच्या लिलावासाठी निविदा दाखल करण्याची अंतिम मुदत २० फेब्रुवारीपर्यंत होती. परंतु एकच निविदा दाखल झाली होती, त्यामुळे निविदा प्रक्रिया रद्द करावी लागली.
स्वामी रामानंदभारती सहकारी सूतगिरणीकडे ४५.८१ कोटी, शेतकरी विणकरी सूतगिरणीकडे ४९.३१ कोटी, खानापूर तालुका को-ऑप. स्पिनिंग मिल्सकडे १७.९९ कोटी, प्रतिबिंब मागासवर्गीय इंडस्ट्रिजकडे ७.५५ कोटी व विजयालक्ष्मी कॉटन मिल्सकडे १३.७४ कोटी रुपयांची थकबाकी आहे.
शेतकरी विणकरी, प्रतिबिंब मागासवर्गीय व विजयालक्ष्मी कॉटन मिल या तीन सूतगिरण्या जिल्हा बँकेने मार्च २०२० मध्ये स्वतः खरेदी केल्या आहेत. बँकेने खरेदी केलेल्या कर्जदार संस्थांची सात वर्षांत विल्हेवाट लावून बँकेची कर्जवसुली करणे कायद्यानुसार बंधनकारक आहे.
