मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
नवी दिल्ली / प्रतिनिधी
नवी दिल्ली येथे होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या दिल्ली संपर्क कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्र सदनच्या जुन्या वास्तूत हे कार्यालय साकारण्यात आले असून संमेलन होईपर्यंत हे कार्यालय कार्यरत असणार आहे.
यावेळी केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री तथा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा सहकार्यवाह मुरलीधर (आण्णा) मोहोळ उपस्थित होते. नवी दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियममध्ये छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरीत हे संमेलन २१, २२ आणि २३ फेब्रुवारी २०२५ रोजी होणार आहे.
या संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून साहित्य संमेलनाचे संयोजक, साहित्यिक, साहित्यप्रेमी यांच्यात उत्तम समन्वय आणि संपर्क राहण्यास मदत होणार आहे. यावेळी संमेलनाचे सहसंयोजक श्री. लेशपाल जवळगे यांच्यासह साहित्यप्रेमी आणि युवक-युवती उपस्थित होते. प्रा. डॉ. ताराबाई भवाळकर या संमेलनाच्या अध्यक्षा आहेत.
