
महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांना निवेदन देताना भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार, युवा नेते विजय साळुंखे, अमर माने आदी.
पृथ्वीराज पवार ; निधीसाठी शासनाकडे पाठपुरावा करू
सांगली ः प्रतिनिधी
कृष्णा नदी इतकीच वारणा नदी प्रदूषित झाली आहे. शेरीनाला हा ४० वर्षांन पुर्वी पाणी प्रदूषणाचा एक प्रमुख धोका होता पण आज एक शेरीनालाच नव्हे तर उगमापासून सांगलीपर्यंत दोन्ही नद्यांमध्ये प्रचंड प्रमाणात कारखाने , डेअरी , औद्योगिक वसाहती सोबत गाव, शहरांचे सांडपाणी आणि शेतीचे रासायनिक पाणी मिसळत आहे. या पाण्यावर प्रक्रिया करण्याचा प्रयोग किती काळ करणार आहात ? त्यापेक्षा चांदोली धरणातून थेट पाणी आणण्याचा विचार करा. त्यासाठी आवश्यक सर्व सहकार्य आम्ही करू, अशी भूमिका भाजप किसान मार्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार यांनी महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांच्याकडे आज मांडली.
वारणा उद्भव योजनेचे स्वप्नरंजन पेक्षा वास्तवाचे भान ठेवून महापालिकेने निर्णय घेतले पाहिजेत. वारणा नदीत मासे आणि मगर मरत असेल तर ते पाणी आता पिण्यायोग्य राहिले आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पृथ्वीराज पवार म्हणाले, की कृष्णा नदीत सांगलीत शेरीनाला मिसळतो, मात्र उगमापासून २९ पेक्षा जास्त मोठ्या गावांचे, तीन मोठ्या शहरांचे सांडपाणी, साखर कारखान्यांचे मळीमिश्रित पाणी आणि हजारो एकर ऊस शेतीचे रासायनिक पाणी नदीत मिसळते आहे. हीच अवस्थात वारणा नदी बाबत झाली आहे. अशावेळी कृष्णेतून उठायचे आणि वारणेत पंप सोडायचे, हा प्रयोग पैशांचा अपव्यय ठरणारा आहे. शेरीनाला योजना सहा महिन्यात मार्गी लागली तरीही तो चकवाच ठरेल . कृष्णा, वारणा नद्यांच्या प्रदुषणाचा प्रश्न येत्या एक-दीड दशकात नदी मृत घोषित करावी लागेल इतक्या गंभीर वळणावर आहे. त्याच्याशी समस्त सांगलीकरांनी एकजुटीने स्वतंत्रपणे लढावे लागेल. त्यासाठीही आमची तयारी आहे.
पण अशा स्थितीत वारणा उद्धव योजना हट्टाने रेटण्याचा प्रयत्न महापालिकेने करू नये. हा पैसा पाण्यात जाईल आणि पुन्हा पंचवीस-तीस वर्षे शासन सांगलीच्या पाणी योजनेला नव्याने पैसे देणार नाही. त्यामुळे आताच विचारपूर्वक निर्णय घ्यावा. चांदोली धरणातून थेट पाणी, तेही सायपन पद्धतीने आणणे शक्य आहे. त्यावर अभ्यास झाला आहे. त्याचा एक प्रारूप आराखडा लवकरच तयार करुन महापालिकेस देत आहोत. हवा तर शासनाकडून पुन्हा एकदा अभ्यास समिती नेमूया. कोल्हापूर शहराला काळम्मवाडी धरणातून पाणी येऊ शकते तर सांगलीला चांदोलीतून पाणी आणता येईल. हा व्यापक व दीर्घकालीन हिताचा निर्णय आहे. पक्ष, गट, तट सारे बाजूला ठेवून सांगलीकर त्याला साथ देतील. सांगलीच्या लोकांच्या जिविताचा विचार करा, अशी आग्रही भूमिका पृथ्वीराज पवार यांनी मांडली.