मार्चपर्यंतचे वेळापत्रक; तिकिटांची उपलब्धता ; नागरिक जागृती मंचच्या पाठपुराव्याला यश
सांगली : प्रतिनिधी
सांगली जिल्हा नागरिक जागृती मंचच्या पाठपुराव्यामुळे कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी, तासगाव, विटा परिसरातील प्रवाशांना मथुरा, आग्रा, ऋषिकेश, हरिद्वारला जाण्यासाठी विशेष रेल्वे गाड्या उपलब्ध झाल्या आहेत. सांगली स्थानकावरूनही येथील प्रवाशांना यात्रा करता येणार आहे. सांगलीतून तिर्थक्षेत्र वारी करणाऱ्या भाविकांची यामुळे चांगली सोय होणार आहे.
सांगली स्थानकावरून ऋषिकेश हरिद्वार गाडीची एसी स्लीपर व स्लीपर क्लास तिकिटे उपलब्ध झाली आहेत. ७ जानेवारी, ११ फेब्रुवारी, १८ फेब्रुवारी, २५ फेब्रुवारी, ४ मार्च या दिवशी ही गाडी (क्र.०७३६३) उपलब्ध होणार आहे. सांगली रेल्वे स्थानकावरून सोमवारी रात्रीची महालक्ष्मी एक्सप्रेस गेल्यानंतर मंगळवारी पहाटे ३:१५ वाजता ही गाडी सुटणार आहे.
सांगली स्टेशनवरून सुटून पुणे, दौंड, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, ईटारसी, भोपाळ, बिना, झांसी, ग्वाल्हेर, आग्रा, मथुरा, दिल्ली (निजामुदीन), गाझियाबाद, मेरठ, मुझफ्फरनगर, देवबंद, टपरी, रुडकी येथे थांबून गुरुवारी रात्री १० वाजता हरिद्वारला तर रात्री साडे अकरा वाजता ऋषिकेशला पोहोचेल. गाडीला भरपूर मागणी असल्याने प्रवाशांनी तिकिटे सांगली स्थानकातून किंवा आयआरसीटीसी संकेत स्थळावरून बुक करावित, बोर्डिंग स्टेशन सांगली टाकावे, असे आवाहन नागरिक जागृती मंचने केले आहे.
